बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावात उपवासासाठी वापरल्या जाणाऱ्या भगरीच्या पिठामुळे आठ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटदुखी, उलट्या आणि चक्कर अशी लक्षणे दिसताच सर्वांना डोर्लेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन महिलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे.
ही घटना समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने संबंधित किराणा दुकानावर कारवाई करत भगरीचे पीठ ताब्यात घेतले असून तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, पिठात पाणी मिसळल्यानंतर जीवाणूंची वाढ होऊन ही विषबाधा झाली असावी, असा संशय आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, ज्यांनी या दुकानातून भगरीचे पीठ खरेदी केले आहे, त्यांनी ते तातडीने वापरणे थांबवावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
©2026. All Rights Reserved.