महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला असून राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.
या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. नगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आणि महानगरपालिकांच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागातही निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.
राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच टप्प्यात न होता, सध्या केवळ १२ जिल्ह्यांपुरत्याच निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावर आदेश आल्यानंतरच पुढील तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांचे लक्ष आता न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
तालुक्यांत इच्छुकांची गर्दी, राजकीय हालचालींना वेग
निवडणुकीची घोषणा होताच तालुका पातळीवर इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली आहे. अनेक ठिकाणी संभाव्य उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या बैठका, संपर्क दौरे सुरू केले असून पक्षांतर्गत हालचालींनाही वेग आला आहे. काही ठिकाणी माजी पदाधिकारी, आजी–माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.
नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमुळे आधीच तापलेले राजकीय वातावरण आता ग्रामीण भागात अधिकच चुरशीचे होण्याची चिन्हे आहेत. आगामी काही दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील व पंचायत समिती कार्यालयांमध्ये गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ग्रामीण सत्ताकेंद्रासाठी रंगणार लढत
जिल्हा परिषद व पंचायत समिती या ग्रामीण भागातील महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकांचे निकाल आगामी काळातील राज्यातील ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणारे ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
©2026. All Rights Reserved.