इंदापूर तालुक्यातील आरटीई (शिक्षणाचा अधिकार) प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अनिता खरात यांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने चौकशी करून ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक पालकांनी शाळेजवळ राहतात असे दाखवण्यासाठी बनावट पत्ते वापरले आहेत. काही अर्जांमध्ये शाळेपासून अवघ्या 0.34 मीटर, 0.37 मीटर किंवा 0.47 मीटर अंतर दाखवण्यात आले असून प्रत्यक्षात त्या ठिकाणी राहण्याची कोणतीही सोय नसल्याचे निदर्शनास येत आहे. काहींनी पत्र्याच्या शेड्स किंवा दुकानांचे पत्ते दाखवून अर्ज भरले असल्याचेही उघड झाले आहे.
याशिवाय, काही स्थानिकांनी पैशाच्या मोबदल्यात आपल्या छोट्या घरांचे एकाच वेळी अनेक भाडेकरार करून दिल्याचा प्रकारही समोर आला आहे. विशेष म्हणजे, अनेक भाडेकरार अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच्या तारखांचे असल्याचेही आढळून आले आहे.
अनिता खरात यांनी सांगितले की, “आरटीई प्रवेशाचा उद्देश हा गरीब व गरजू मुलांना शिक्षणाची संधी देणे हा आहे. मात्र सध्या पैशाच्या आणि ओळखीच्या जोरावर श्रीमंत कुटुंबे या योजनेचा गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे खऱ्या गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही.”
तसेच, इंदापूरपासून 25 ते 30 किलोमीटर दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आरटीई अंतर्गत प्रवेश मिळत असल्याचे उदाहरण देत, अंतराच्या नियमांची अंमलबजावणी कशी केली जाते याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
गेल्या वर्षीही अशाच प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र यावर्षीही त्याच प्रकारची पुनरावृत्ती होत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून दोन दिवसांत चौकशी पूर्ण करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“आमचा कुठल्याही मुलाच्या शिक्षणाला विरोध नाही, पण आरटीईचा खरा लाभ गरजूंपर्यंत पोहोचला पाहिजे,” असे स्पष्ट करत अनिता खरात यांनी शासनाला योग्य धोरणात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.
©2026. All Rights Reserved.