सायबर फसवणुकीविरोधात जनजागृतीचा यशस्वी उपक्रम विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" या उपक्रमांतर्गत नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी "सायबर वारी" या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशात सायबर वॉरियर्सनी टाळ-मृदंग, फलक, घोषवाक्ये आणि माहितीपर संदेशांच्या माध्यमातून परिसरात प्रभातफेरी काढत नागरिक व वारकऱ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमाला वारकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी ऑनलाईन फसवणूक, ओटीपी फसवणूक, बनावट बँक कॉल, केवायसी अद्ययावत करण्याच्या नावाखाली होणारी फसवणूक, क्यूआर कोडद्वारे होणारी फसवणूक, बनावट संकेतस्थळांच्या (लिंक) माध्यमातून होणारी फसवणूक, समाजमाध्यमांवरील फसवणूक, डिजिटल अटक आणि यूपीआय व्यवहारातील फसवणूक अशा विविध सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच "सजग नागरिक, सुरक्षित सायबर विश्व" हा संदेश देत वारकरी व नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद संदेश, कॉल किंवा लिंकवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
उपक्रमादरम्यान माहितीपत्रकांचे वाटप, जनजागृतीपर घोषणाबाजी आणि नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून सुरक्षित डिजिटल व्यवहारांसाठी आवश्यक खबरदारीबाबत माहिती देण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, क्विक हील फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि सायबर वॉरियर्स यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. समाजात सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम विशेष प्रभावी ठरला.
©2026. All Rights Reserved.