आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना केवळ तंत्रज्ञानाचा वापर करता येणे पुरेसे नसून त्याचा सुरक्षित, सजग आणि जबाबदारीने वापर करता येणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उर्दू माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सायबर जनजागृतीपर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या सत्रामध्ये सायबर योद्ध्या वृषाली शिंदे आणि नंदिनी साखरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत दैनंदिन जीवनात घडणाऱ्या विविध सायबर गुन्ह्यांची माहिती दिली. ओटीपी फसवणूक, क्यूआर कोड फसवणूक, फिशिंग, बनावट फोन कॉल व संदेश, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, समाजमाध्यमांवरील धोके, छायाचित्रांमध्ये फेरफार तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तयार होणाऱ्या बनावट चित्रफिती यांसारख्या सायबर गुन्ह्यांची माहिती उदाहरणांसह समजावून सांगण्यात आली.
तसेच क्विक हील फाउंडेशनच्या सायबर सुरक्षितता व फसवणूक प्रतिबंधक मार्गदर्शनामध्ये ऑनलाइन फसवणुकीच्या नव्या पद्धती, बनावट संदेश व दुवे ओळखणे, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे आणि डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) सुरक्षित वापर आणि त्याचा गैरवापर करून होणाऱ्या फसवणुकींपासून सावध राहण्याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेची माहिती अधिक प्रभावीपणे मिळावी यासाठी क्विक हील फाउंडेशनच्या सायबर जनजागृतीपर पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. या पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांना सायबर फसवणुकीचे प्रकार, प्रतिबंधात्मक उपाय आणि सुरक्षित डिजिटल वापराबाबतची माहिती पुढेही संदर्भासाठी उपलब्ध राहणार आहे.
सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ओटीपी, संकेतशब्द, पिन किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, अनोळखी दुव्यांवर क्लिक करू नये, क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी त्याची खात्री करावी आणि ऑनलाइन व्यवहार करताना विशेष सतर्कता बाळगावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी उर्दू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सिकंदर सर तसेच वर्गशिक्षक इनामदार सर यांचीही उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे महत्त्व समजून घेऊन दैनंदिन डिजिटल वापरात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले.
सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. संवादात्मक पद्धतीने घेण्यात आलेल्या या सत्रामुळे विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे कसे ओळखावेत आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा, हे अधिक प्रभावीपणे समजले.
“थांबा, विचार करा आणि मगच क्लिक करा!” या संदेशातून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल नागरिक बनण्याची प्रेरणा देण्यात आली.
विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायबर सुरक्षिततेची सुरुवात जागरूकतेपासून होते, हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
©2026. All Rights Reserved.