बारामती नगरपरिषदेच्या स्थगित निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर होताच शहरात पुन्हा एकदा प्रचाराची धग वाढली आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नवनवीन आणि प्रभावी मार्ग अवलंबत आहेत. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पठाण मोहसिन अकबर यांनी बारामतीकरांसाठी विकास, सुविधा आणि सामाजिक सुरक्षेचा समतोल साधणारा हटके वचननामा जाहीर केला असून त्याची शहरभर चर्चा सुरू झाली आहे.
● कर सवलतीपासून थेट सेवा घरापर्यंत
या वचननाम्यात घरपट्टी व पाणीपट्टीत ३ टक्के कपात, नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार निवारण दालन, तसेच मोबाईल व्हॅनद्वारे नगरपरिषदेच्या सेवा थेट नागरिकांच्या दारात पोहोचवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ई-रिक्षा प्रवास ही योजना विशेष लक्ष वेधून घेत आहे.
● शिक्षण, रोजगार आणि सामाजिक न्यायावर भर
नगरपरिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावून आधुनिक तंत्रज्ञान व उच्चशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. २०१८ नंतरच्या कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी, उद्योगक्षम तरुणांना कर्ज, तसेच प्रत्येक बेरोजगार तरुणाला महिन्याला ६०० रुपये देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.
● महिला, ज्येष्ठ व दिव्यांगांसाठी विशेष योजना
महिलांच्या बचतगटांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी विशेष योजना राबवून महिन्याला ६०० रुपये, तसेच दिव्यांग नागरिकांना आर्थिक मदत व उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे वचन देण्यात आले आहे.
● वाहतूक, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांचा विकास
ट्रॅफिकमुक्त बारामतीसाठी प्रत्येक चौकात सिग्नल व्यवस्था, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही निगराणी, रिक्षाचालक व पथविक्रेत्यांना हक्काची जागा, तसेच व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष योजना राबवण्याचा निर्धार या वचननाम्यात आहे.
सूर्यनगरी, तांबेनगर, महिला सोसायटी व व्यापाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सिटी इन चौक पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
● स्वच्छ, पारदर्शक आणि २४ तास उपलब्ध नगरपरिषद
प्रत्येक पात्र नागरिकाला हक्काचे घर, प्रत्येक घर व सोसायटीमध्ये सोलार प्रकल्प, विकासकामांसाठी जमीन गेलेल्यांना योग्य मोबदला, तसेच भ्रष्टाचारमुक्त, एक फोनवर समस्या सोडवणारी आणि २४ तास नागरिकांच्या सेवेत असणारी आदर्श नगरपरिषद घडवण्याचा संकल्प पठाण मोहसिन अकबर यांनी व्यक्त केला आहे.
या वचननाम्याच्या माध्यमातून त्यांनी किटली या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन केले असून, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख आश्वासनांमुळे या वचननाम्याची शहरात जोरदार चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
©2026. All Rights Reserved.