● यवत : वार्ताहर
यवत (ता. दौंड) येथे रविवारी (दि.२१) ग्रामस्थांनी वनभोजनासाठी संपूर्ण गाव बंद ठेवले होते. आषाढ महिन्यात वनभोजनासाठी एक दिवस गाव बंद ठेवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा यानिमित्ताने ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे.
रविवारी सकाळी ग्रामस्थांनी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ आणि महालक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून गावाला प्रदक्षिणा घातली. यानंतर पारंपारीक पद्धतीने संपूर्ण गावातील अबाल थोर नागरिक, महिला गावाच्या शिवेबाहेर जात वनभोजनाचा आनंद लुटला. दरम्यान गावातील सर्व दुकाने यासह व्यवसाय बंद ठेवत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या काळात गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे गावात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना, नागरिकांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली होती.
यवत येथे आषाढ महिन्याच्या रविवारी पूर्वांपार चालत आलेल्या परंपरेनुसार गाव बंद ठेऊन सर्व नागरिक गावच्या बाहेर जाऊन वनभोजनाचा आनंद घेत असतात. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन सर्व नागरिक वनभोजन करीत असल्याने एकप्रकारे आनंद आणि समाधान मिळते.
- समीर दोरगे (सरपंच, यवत)
ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थान व श्री महालक्ष्मी मातेचा छबीना सकाळीच काढण्यात आला होता. पारंपरिक ढोल ताशे, हलगी संबळ वाद्यांच्या धूमधडाक्यात पोतराज गोंधळी यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गाव प्रदक्षिणा दरम्यान समस्त ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते. गावातील युवा तरुणांनी कबड्डीचा खेळ मांडला होता तर काहींना आकाशात पतंग उडविण्याचा मोह आवरता आला नाही. निसर्ग देवतेचा मनापासून आनंद घेऊन मन प्रसन्न झाले असल्याचे दिसून आले. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून निसर्गाच्या सान्निध्यात दुपारी वन भोजनाचा आनंद घेतला. दिवसभर गावात शुकशुकाट असल्याचे पाहून कोरोना काळातील भयानक परिस्थितीची आठवण झाल्याची बाब नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.
©2026. All Rights Reserved.