पिंपळी (ता. बारामती) येथील विद्या प्रतिष्ठानच्या न्यू बाल विकास मंदिरचा १६ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम गदिमा सभागृहात बुधवारी (दि. ३ डिसेंबर) पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून गौरी अशोकराव थोरात (मिसेस इंडिया हेरिटेज) उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षणाचे अत्यंत महत्त्व आहे. यश म्हणजे काय? पैसा, लोकप्रियता पण यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे तुमचं जीवनातील ध्येय आणि प्रेरणा होय. शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासा, स्वप्न पूर्ण करा. स्वतः कोण आहे हे ओळखा. छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा मार्गदर्शक सल्ला गौरी थोरात यांनी दिला.
यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या सचिव ॲड. निलीमा गुजर, कार्यकारी सदस्य डॉ. राजीव शहा, पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा शर्मिला कुंभार व सहसचिव विक्रम पानसरे, माधवी गोडबोले यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या तनुश्री गोरे यांनी केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही 'बारिश : एक सूरमयी सफ़र' या नवीन संकल्पनेवर आधारित सुमारे ६०० विद्यार्थी कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रमात आपले कलागुण सादर केले. पावसाच्या विविध रूपांचे दर्शन विद्यार्थ्यांनी गाणी, नृत्य, नाटक याद्वारे अतिशय सुंदररित्या घडविले. कार्यक्रम चांगला होण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांची मेहनत दिसून आली. या कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्याचे दुःख, पाणी बचत, पावसाचे नियोजन या गोष्टी विद्यार्थ्यांना समजल्या. यामध्ये नर्सरी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसेच विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या उत्तम कामगिरीचा गौरव याठिकाणी करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयाच्या प्राचार्या तनुश्री गोरे यांच्यासह माध्यमिक विभागप्रमुख लीला शेट्टी, प्राथमिक विभागप्रमुख माधुरी दिक्षित, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख रुपाली सावरे व सांस्कृतिक कार्यक्रमप्रमुख फरीदा नबाब या शिक्षिकांनी सहकार्याची भूमिका बजावली.
सदर कार्यक्रमासाठी लागणारे नेपथ्य व रंगमंच सजावट कलाशिक्षक वृषाली साबळे व सचिन कुंभार यांनी केले, तर सूत्रसंचालन कविता मदने आणि अर्चना राजोपाध्ये यांनी केले.
©2026. All Rights Reserved.