संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच ठिकठिकाणी अपूर्ण व बंद पडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी ठाम मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. १७) झालेल्या या भेटीत त्यांनी सविस्तर पत्र देऊन पालखी महामार्गाच्या दुरावस्थेबाबत लक्ष वेधले. या वेळी अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या.
संत तुकाराम महाराज पालखी (राष्ट्रीय महामार्ग ९६५ जी) देहू–पंढरपूर मार्गावरील भवानीनगर–इंदापूर–सराटी दरम्यान सुमारे ७० किलोमीटरचे काम गेल्या अनेक वर्षांपासून कासवगतीने सुरू असून, निकृष्ट दर्जामुळे नागरिक व प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे झालेल्या कामांची सखोल चौकशी करून दर्जेदार काम करून घ्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
या पत्रात निमगाव केतकी व बावडा बाह्यवळण रस्ता, वकीलवस्ती येथील भुयारी मार्ग, वडापुरी उड्डाणपूल, तसेच तरंगवाडी, लासुर्णे, भवानीनगर–सणसर आदी ठिकाणची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. इस्टिमेटनुसार वृक्षारोपण, रस्ता दुभाजक, स्ट्रीट लाईट, दिशादर्शक फलक व गटारींची कामे अनेक ठिकाणी झालेली नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.
यंदाच्या जुलै महिन्यातील पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरवड येथे तर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पालखी रथ मार्गावरील गावागावातील सेवा रस्ते रुंद व दर्जेदार करण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे.
अपूर्ण कामे असतानाच टोल वसुली सुरू करण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, करारानुसार सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच टोल वसुली सुरू करावी, तोपर्यंत टोल बंद ठेवावा, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. अपूर्ण कामांमुळे अनेक अपघात होऊन जीवितहानी झाल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
आगामी पालखी सोहळ्यापूर्वी सर्व कामे दर्जेदाररीत्या पूर्ण व्हावीत, यासाठी विशेष बैठक घेऊन संबंधितांना तातडीचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी मार्गावरील निकृष्ट कामांची चौकशी करून अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत संबंधितांना तातडीचे आदेश दिले जातील, असे आश्वासन दिल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
©2026. All Rights Reserved.